The Sapiens News

दि.सेपिअन्स न्युज

The Sapiens News

दि. सेपिअन्स न्युज

भारताच्या राष्ट्रपतींनी राष्ट्रपती भवनात केले ग्रंथ कुटीरचे उद्घाटन

भारताच्या राष्ट्रपती, श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी आज (२३ जानेवारी, २०२५) राष्ट्रपती भवनात ‘ग्रंथ कुटीर’चे उद्घाटन केले. ग्रंथ कुटीरमध्ये भारताच्या ११ अभिजात भाषांमधील हस्तलिखिते आणि पुस्तकांचा समृद्ध संग्रह आहे, ज्यात तमिळ, संस्कृत, कन्नड, तेलगू, मल्याळम, ओडिया, मराठी, पाली, प्राकृत, आसामी आणि बंगाली या भाषांचा समावेश आहे.

ग्रंथ कुटीर भारताचा समृद्ध आणि वैविध्यपूर्ण सांस्कृतिक, तात्विक, साहित्यिक आणि बौद्धिक वारसा दर्शवते. या कुटीरमध्ये भारताच्या ११ भारतीय अभिजात भाषांमधील सुमारे २,३०० पुस्तकांचा संग्रह आहे. भारत सरकारने ३ ऑक्टोबर, २०२४ रोजी मराठी, पाली, प्राकृत, आसामी आणि बंगाली भाषांना ‘अभिजात भाषेचा’ दर्जा दिला. त्यापूर्वी, सहा भाषांना अभिजात भाषेचा दर्जा होता. ग्रंथ कुटीरच्या संग्रहामध्ये महाकाव्ये, तत्त्वज्ञान, भाषाशास्त्र, इतिहास, शासन, विज्ञान आणि भक्ती साहित्य यांसारख्या विविध विषयांचा, तसेच या भाषांमधील भारताच्या संविधानाचा समावेश आहे. सुमारे ५० हस्तलिखिते देखील या संग्रहाचा भाग आहेत. यापैकी अनेक हस्तलिखिते ताडपत्र, कागद, झाडाची साल आणि कापड यांसारख्या पारंपरिक साहित्यावर हाताने लिहिलेली आहेत.

ग्रंथ कुटीरचा विकास केंद्र सरकार, राज्य सरकारे, विद्यापीठे, संशोधन संस्था, सांस्कृतिक संस्था आणि देशभरातील वैयक्तिक देणगीदारांच्या सहकार्याने करण्यात आला आहे. शिक्षण मंत्रालय आणि संस्कृती मंत्रालय तसेच त्यांच्याशी संबंधित संस्थांनी या उपक्रमाला पाठिंबा दिला आहे. इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्र (आयजीएनसीए) हस्तलिखितांचे व्यवस्थापन, संवर्धन, दस्तऐवजीकरण आणि प्रदर्शनासाठी व्यावसायिक कौशल्य प्रदान करत आहे.

ग्रंथ कुटीर विकसित करण्याचा उद्देश भारताच्या समृद्ध सांस्कृतिक आणि साहित्यिक वारशाबद्दल नागरिकांमध्ये जागरूकता वाढवणे हा आहे. वसाहतवादी मानसिकतेचे अवशेष नष्ट करण्याच्या राष्ट्रीय संकल्पाच्या अनुषंगाने, विविधतेतील एकतेची भावना वाढवत, प्रमुख कलाकृतींच्या माध्यमातून समृद्ध वारसा प्रदर्शित करण्यासाठी ग्रंथ कुटीर विकसित करण्यात आले आहे. ग्रंथ कुटीर हा ‘ज्ञान भारतम मिशन’च्या दृष्टिकोनाला पाठिंबा देण्याचा एक प्रयत्न आहे, जे भारताच्या विशाल हस्तलिखित वारशाचे जतन, डिजिटायझेशन आणि प्रसार करण्यासाठी, तसेच भावी पिढ्यांसाठी परंपरा आणि तंत्रज्ञानाचे एकत्रीकरण करण्यासाठी एक राष्ट्रीय उपक्रम आहे.

पूर्वी येथे ‘अ कॅटलॉग ऑफ द ओरिजिनल वर्क्स ऑफ विल्यम होगार्थ’, ‘स्पीचेस ऑफ लॉर्ड कर्झन ऑफ केडलस्टन’, ‘समरी ऑफ द ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ लॉर्ड कर्झन ऑफ केडलस्टन’, ‘लाइफ ऑफ लॉर्ड कर्झन’, ‘पंच मॅगझिन्स’ आणि इतर पुस्तके ठेवली होती. ही पुस्तके आता राष्ट्रपती भवन परिसरातील एका स्वतंत्र जागेत हलवण्यात आली आहेत. अभिलेखागार संग्रहाचा भाग असलेल्या या पुस्तकांचे डिजिटायझेशन करण्यात आले असून, ती संशोधक विद्वानांना ऑनलाइन उपलब्ध करून दिली जातील.

राष्ट्रपती भवनाच्या सर्किट १ च्या मार्गदर्शित दौऱ्यादरम्यान अभ्यागतांना या कलाकृती आणि हस्तलिखितांची झलक पाहता येईल. तसेच, लोक या संग्रहाची माहिती मिळवू शकतील आणि ऑनलाइन पोर्टलद्वारे उपलब्ध होणारी पुस्तके व हस्तलिखिते वाचू शकतील. संशोधक ‘ग्रंथ कुटीर’मध्ये प्रत्यक्ष प्रवेशासाठी पोर्टलद्वारे अर्ज करू शकतात.

या भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यास हातभार लावलेल्या काही प्राचीन ग्रंथांमध्ये संस्कृतमधील वेद, पुराणे आणि उपनिषदे; मराठीतील सर्वात जुना ज्ञात साहित्यिक ग्रंथ ‘गाथासप्तशती’; पाली भाषेतील ‘विनय पिटक’, ज्यात बौद्ध भिक्षूंसाठी मठवासी नियमांची रूपरेषा आहे; जैन आगम आणि प्राकृत शिलालेख, जे महत्त्वपूर्ण ऐतिहासिक नोंदी म्हणून काम करतात; आसामी, बंगाली आणि ओडिया भाषेतील प्राचीन बौद्ध तांत्रिक ग्रंथ ‘चर्यापदे’; जीवनाच्या विविध पैलूंवरील अभिजात तमिळ ग्रंथ ‘तिरुक्कुरल’; तेलुगुमधील ‘महाभारत’; कन्नडमधील अलंकारशास्त्र, काव्यशास्त्र आणि व्याकरणावरील सर्वात जुना उपलब्ध ग्रंथ ‘कविराजमार्ग’ आणि मल्याळममधील ‘रामचरितम’ यांचा समावेश आहे.

ग्रंथ कुटीरच्या उद्घाटनानंतर उपस्थितांना संबोधित करताना राष्ट्रपती म्हणाल्या की, अभिजात भाषांनी भारतीय संस्कृतीचा पाया घातला आहे. विज्ञान, योग, आयुर्वेद आणि भारताच्या अभिजात भाषांमध्ये रचलेल्या साहित्याच्या ज्ञानाने शतकानुशतके जगाला मार्गदर्शन केले आहे. तिरुक्कुरल आणि अर्थशास्त्र यांसारखे ग्रंथ आजही प्रासंगिक आहेत. या भाषांच्या माध्यमातून गणित, खगोलशास्त्र, आयुर्वेद आणि व्याकरण यांसारख्या विषयांचा विकास झाला आहे. पाणिनीचे व्याकरण, आर्यभटाचे गणित आणि चरक व सुश्रुतांचे वैद्यकशास्त्र आजही जगाला चकित करते. या अभिजात भाषांनी आधुनिक भारतीय भाषांच्या विकासातही महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. या भाषांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी आणि त्यांच्या संवर्धन व विकासाला चालना देण्यासाठी, त्यांना अभिजात भाषांचा विशेष दर्जा देण्यात आला आहे.

राष्ट्रपती म्हणाल्या की, अभिजात भाषांमध्ये जमा झालेली ज्ञानाची संपत्ती आपल्याला आपल्या समृद्ध भूतकाळापासून शिकण्याची आणि उज्ज्वल भविष्य घडवण्याची प्रेरणा देते. वारसा आणि विकास यांचा हा संगम, जे आपले मार्गदर्शक तत्त्व आहे, ते अभिजात भाषांचे महत्त्व अधोरेखित करते.

राष्ट्रपती म्हणाल्या की, आपल्या भाषांचा वारसा जतन करणे आणि त्याला प्रोत्साहन देणे ही सर्व कर्तव्यदक्ष लोकांची सामूहिक जबाबदारी आहे. विद्यापीठांमध्ये अभिजात भाषांच्या अभ्यासाला प्रोत्साहन देणे, तरुणांना किमान एक अभिजात भाषा शिकण्यासाठी प्रोत्साहित करणे आणि या भाषांमधील अधिक पुस्तके ग्रंथालयांमध्ये उपलब्ध करून देणे हे या भाषांच्या संवर्धन आणि प्रचारासाठी महत्त्वाचे आहे.

राष्ट्रपती म्हणाल्या की, ग्रंथ कुटीर हा भारताच्या अभिजात भाषांच्या संवर्धन आणि प्रचारासाठी राष्ट्रपती भवनाच्या सामूहिक प्रयत्नांचा एक भाग आहे. या कुटीरमध्ये अभिजात भाषांशी संबंधित साहित्याचा संग्रह वाढतच राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या कुटीरमधील संग्रह सर्व अभ्यागतांना, विशेषतः तरुणांना, अभिजात भाषांबद्दल जाणून घेण्यासाठी आणि त्या समजून घेण्यासाठी प्रेरित करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

या प्रसंगी उपस्थित मान्यवरांमध्ये संस्कृती राज्यमंत्री श्री राव इंद्रजित सिंह, शिक्षण राज्यमंत्री श्री जयंत चौधरी, विषय तज्ञ, देणगीदार आणि राज्यांचे प्रतिनिधी यांचा समावेश होता.

Vote Here

[TS_Poll id="1"]
UPSE Coaching

Recent Posts