पर्यावरण संवर्धनाच्या क्षेत्रात भोकणी ग्रामपंचायतीने सलग दुसऱ्या वर्षी आपल्या यशाचे शिखर गाठले आहे. “माझी वसुंधरा अभियान ५.०’ अंतर्गत नाशिक विभागात प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल ५० लाख रुपयांचा पुरस्कार राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते शनिवारी (दि. २१) मुंबई येथे प्रदान केला.
राज्यपाल आचार्यदेवव्रत, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, पर्यावरण विभागाच्या सचिव राजश्री भोज आदी मान्यवर पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी उपस्थित होते. सरपंच अरुण वाघ, ग्रामपंचायत अधिकारी योगेश राहणे, कृषी विस्तार अधिकारी मोकळ यांच्यासह ग्रामस्थांनी पुरस्काराचा स्वीकार केला.
माझी वसुंधरा अभियान ५.० अंतर्गत राज्यस्तरावरील पाचव्या क्रमांकाचे ५० लाख रुपयांचे पारितोषिक घोषित झाले आहे.
माझी वसुंधरा अभियानाच्या ५.० टप्प्यात राज्यातील सुमारे २८ हजार ग्रामपंचायती स्पर्धेत होत्या. हरित क्षेत्र वाढ, जलसंवर्धन, स्वच्छ ऊर्जेचा वापर (सौर ऊर्जा), जैवविविधता संवर्धन आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ‘लोकसहभाग’ या निकषांवर ग्रामपंचायतीने बाजी मारली आहे.





