सीमा रस्ते संघटनेच्या (बीआरओ) ‘प्रोजेक्ट चेतक’ने शनिवारी राजस्थानच्या बिकानेर येथे आपला ४७ वा स्थापना दिवस साजरा केला. या निमित्ताने भारताच्या पश्चिम सीमावर्ती भागातील पायाभूत सुविधा मजबूत करण्याच्या सेवेला चार दशकांहून अधिक काळ लोटला आहे.
१९८० मध्ये सुरू झालेल्या ‘प्रोजेक्ट चेतक’ने राजस्थान, पंजाब आणि गुजरातच्या उत्तर भागांमध्ये रस्ते जाळे विकसित करण्यात आणि त्याची देखभाल करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. यामुळे सीमावर्ती भागातील संपर्क व्यवस्था सुधारण्यास आणि राष्ट्रीय सुरक्षा वाढविण्यात योगदान मिळाले आहे.
गेल्या काही वर्षांत, भौगोलिक व्याप्तीच्या दृष्टीने हा प्रकल्प बीआरओ अंतर्गत सर्वात मोठ्या प्रकल्पांपैकी एक म्हणून उदयास आला आहे. या प्रकल्पांतर्गत ४,००० किलोमीटरहून अधिक रस्त्यांचे जाळे आणि २१४ किलोमीटर लांबीच्या कालवा-सह-बंधाऱ्यांच्या पायाभूत सुविधांची देखभाल केली जाते.
‘चेतक का प्रयास, देश का विकास’ या ब्रीदवाक्यासह कार्यरत असलेल्या या प्रकल्पाने, आंतरराष्ट्रीय सीमेकडे जाणाऱ्या महत्त्वाच्या जोड रस्त्यांद्वारे विश्वसनीय संपर्क व्यवस्था सुनिश्चित करून सशस्त्र दलांना पाठिंबा देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. या रस्त्यांना राष्ट्रीय महामार्गाच्या दुपदरी दर्जापर्यंत श्रेणीसुधारित करण्याचे प्रयत्नही सातत्याने सुरू आहेत.




