ही उत्सव मंडळे नाहीत ही तर गुंडांची, राजकीय नेत्यांची शक्ती प्रदर्शनाची अड्डी झाली आहे. राजरोसपणे हुल्लडबाजी करणे, स्वतःचे राजकीय सामाजिक स्थान वधारने वा अधिक मजबूत करणे मिळेल ती वर्गणी न घेता बळाने स्वतःचा आकडा वसूल करणे, त्याच वर्गणीवर 10 दिवस यथेच्छ मद्यपान, धूम्रपान, मौजमजा करणे, सामाजिक उपक्रम कमी नी जुगाराचे डाव चालवणे, त्यातून मिळणारी नाल वाटून खाणे असले प्रकार आज आपल्या पवित्र सण उत्सवात होताना अनेकदा पहावयास मिळतात. या विरोधात कुणी आवाज उठवला तर त्याला दाबून मारले जाते. कारण या गुंडांकडे राजकीय बळ व वरदहस्त असतो. असे नाही की हे सर्वच मंडळ करतात सामाजिक बांधिलकी जपणारी देखील मंडळ आहेत परंतु त्यांची संख्या अल्प अशी झाली आहे.
त्यातही स्वयंघोषित स्वयंसेवक हे भाविकांची जी हेळसांड करतात ती वेगळीच अशा परिस्थितीत नको वाटते सण उत्सव. अनेकदा तर ज्या गाडीवर गणपती बाप्पाची मूर्ती असते त्याच गाडीत मद्याचे ड्रमही मिळतात. अशा वेळी पोलीस यंत्रणा देखील काही करू शकत नाही कारण झुंडशाही असतेच त्यांना संरक्षित करायला आणि त्याला नाव दिले जाते जनआक्रोश, जनविरोध, जनआंदोलन. हीच आपल्या सणांची अवस्था झाली आहे. लहान मुलांना सण उत्सव पाहायला नेणे देखील आज अवघड आहे कारण अवतीभवती अतिशय गलिच्छ आणि तीव्र मद्याचा वास व दुर्गंधी असते असे. आपल्या सणांचे विकृत झालेले स्वरूप आपल्या पुढील पिढीला दाखवण्यापेक्षा आपल्या घरातील बाप्पाची घरातच यथाशक्ती, मनोभावे आणि नतमस्तक होऊन सेवा करावी हेच आज क्रमप्राप्त झाले आहे.




