नाशिक : नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी मंगळवारी दिल्लीत नाशिकच्या विमानसेवेच्या प्रश्नांबाबत केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची भेट घेतली.
नाशिक ते दिल्ली अशी दुसरी विमानसेवा सुरू करावी, नाशिक-मुंबई दरम्यान दररोज दोन उड्डाणे सुरू करावीत तसेच नाशिकला बेंगळुरू, चेन्नई आणि कोलकाता या शहरांशी हवाई मार्गाने जोडावे, अशी विनंती त्यांनी मोहोळयांना केली.
वाजे म्हणाले, “देशातील चार शहरांपैकी नाशिक हे एक शहर आहे जेथे दर 12 वर्षांनी कुंभमेळा भरतो आणि पुढील कुंभमेळा 2027 मध्ये होणार आहे. कुंभमेळा दरम्यान देशभरातून लाखो भाविक नाशिकला भेट देतात. त्यामुळे फ्लाइट्सची संख्या वाढवण्याची आणि नवीन शहरांशी संपर्क वाढवण्याची गरज आहे.
नाशिकहून दिल्लीला दररोज एकच विमानसेवा आहे. वाढती मागणी आणि शहराचे महत्त्व लक्षात घेता नाशिक ते दिल्ली आणखी एक विमान चालविण्याची गरज आहे. यामुळे रहिवाशांच्या गरजा तर पूर्ण होतीलच, पण यात्रेकरू, पर्यटक आणि व्यावसायिक प्रवासी यांचा प्रवास सुखकर होईल,”शिवाय, देशाची आर्थिक राजधानी असलेल्या नाशिक ते मुंबईसाठी दररोज किमान दोन उड्डाणे सुरू करण्याची विनंतीही वाजे यांनी मोहोळ यांना केली.
यामुळे मुंबईला जाणाऱ्या सर्व प्रवाशांची सोय होईल. याचा स्थानिक अर्थव्यवस्थेलाही फायदा होईल आणि जे व्यवसायिक आणि वैयक्तिक कारणांसाठी या दोन शहरांमधून वारंवार ये-जा करतात त्यांच्यासाठी सोयीस्कर प्रवास पर्याय उपलब्ध होईल,” असे त्यांनी स्पष्ट केले.
वाजे यांनी मोहोळ यांना यासंदर्भात निवेदन दिले असून केंद्रीय मंत्र्यांनी याबाबत सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन दिले.





